Friday, January 6, 2017

भक्ती आणि अभिव्यक्ती

"तुमची लायकी आहे का xxxxx ला प्रश्न विचारायची!"

"तुम्हाला अधिकार कोणी दिला xxxxx च्या विचारांची समीक्षा करायला?"

"आधी xxxxx एवढे मोठे कार्य करा, मग प्रश्न विचारा!"

"xxxxx सारख्या सुर्यावर थुंकायला चाललाय तुम्ही, औकातीत रहा!"

"तुम्ही xxxxx विरोधी विचारधारेचे आहात, तुम्हाला कावीळ झालीय तसं जग पिवळं दिसायला लागलंय"

या सगळ्या वाक्यात xxxxx च्या जागी वेद/वैदिक धर्म, येशू/चर्च, पैगंबर, बुद्ध, गांधी, शिवाजी, संघ, मार्क्स, सावरकर, आंबेडकर इत्यादी कुणाचेही नाव टाकून बघा... ती वाक्ये यांचा कुठला ना कुठला भक्त बेंबीच्या देठापासून शिव्या घालत यांना प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येकाला बोलत असतो.

भक्ती करायला अक्कल थोडीच लागते? डोळे झाकून आहे ते चालू ठेवायचे असते, status quo पाळायचा असतो. प्रश्न विचारायला मात्र नकीच अक्कल, शहाणपण लागते. काही प्रश्न अख्ख्या विचारधारेलाच सुरुंग लावू शकतात, त्याने प्रस्थापितांची दुकाने बंद होऊ शकतात. म्हणूनच जगातील समस्त समाज/विचारधारा प्रश्नांना घाबरतात, आणि प्रश्न विचारणाऱ्यांच्या अंगावर भक्तांच्या फौजा धाडून देतात.

गंमतीचा भाग हा की वर लिहिलेली सर्व नावे, विचारधारा ह्या त्यांच्या काळात व्यवस्थेच्या विरोधात होत्या, क्रांतिकारक होत्या. आणि त्यांना तत्कालीन समाजाने, व्यवस्थेने शक्य तितका त्रास केला, विरोध केला आणि प्रसंगी त्यांचा जीव सुद्धा घेतला. तेव्हा क्रांतिकारी असणाऱ्या ह्या व्यक्ती, विचारधारा आज प्रस्थपित आहेत आणि आज जेव्हा त्यांची कुणीही चिकित्सा करेल तेव्हा त्यांचे पुरोहित, भक्त अगदी तेच करतील जे इतिहासकाळात त्यांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या नेत्याला/विचारप्रवाहाला तत्कालीन प्रस्थपितांनी केले होते.

विश्वाच्या अंतापर्यंत हा भक्ती आणि चिकित्सेचा संघर्ष चालू असणार आहे. आणि मी भक्तीच्या, कुणाचा तरी 'वादी' होण्याच्या बाजूला कधीही जाणार नाही, कारण ती निर्बुद्ध लोकांचे लक्षण असते.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ३ नोव्हेंबर २०१६, ११.१४ )

No comments:

Post a Comment