माळी समाजात जन्मलेले महात्मा फुले, छत्रपती शिवाजींच्या समाधीचा जीर्णोद्धार करायचे,
तेच महात्मा फुले समस्त स्त्रियांना शिकवत, या भारताला पहिली मुस्लिम शिक्षिका द्यायचे,
संविधानकार डॉ. आंबेडकरांना मार्गदर्शक बनत, तेच महात्मा फुले देशाचा इतिहास घडवायचे,
छत्रपती शाहू गंगारामला हॉटेल टाकून द्यायचे, दलितांना नोकरी-शिक्षणात आरक्षण द्यायचे,
जन्माने जैन असणारे कर्मवीर भाऊराव पाटील, दीनदलित मुलांच्या शिक्षणासाठी सर्वस्व विकून टाकायचे,
वैराग्य पत्करलेले गाडगेबाबा, भाऊरावांना आणि बाबासाहेबांना शाळेसाठी जमिनी दान करायचे,
जन्माने ब्राम्हण असलेले अत्रे, ब्राह्मण्यावर कडाडून हल्ला करणाऱ्या महात्मा फुलेंवर सिनेमा काढायचे,
ब्राम्हण कुटुंबात जन्मलेले साने गुरुजी, दलितांना विठ्ठलाच्या देवळात प्रवेशासाठी आमरण उपोषण करायचे,
जिथे 3200 कोटींची फाईव्ह स्टार स्मारके नव्हती,
नामांतरासाठी कुणाचं रक्त सांडायची गरज नव्हती,
इतिहास संशोधन संस्था फोडायची विकृती नव्हती,
साहित्यिकांचे पुतळे फोडायची हीन संस्कृती नव्हती,
जातींच्या नावाखाली मोर्चे काढायची पद्धत नव्हती,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही नित्याची बाब नव्हती,
त्या मह्नमंगल महाराष्ट्रात मला मरायचंय !!
- डॉ. विनय काटे
६ जानेवारी २०१७
No comments:
Post a Comment