Friday, January 6, 2017

अभिव्यक्ती आणि वादविवाद

माणूस कुठल्याही व्यक्तीला, विचारधारेला शरण गेला की तो तर्काला, स्वतंत्र विचारांना मूठमाती देतो. मग तो कुठल्या तरी विचारांचा 'वादी' बनतो किंवा कुठल्या तरी व्यक्तीचा/धर्माचा अंध अनुयायी. अंध अनुयायांची संख्या किती आहे याने कुठलाही व्यक्ती, विचारवंत किंवा धर्म विचार कधीही मोठा ठरत नाही. कारण अंध अनुयायी हे मागे चालतात, पुढे नाही. त्यांना स्वतःचा विचार नसतोच मुळी. आणि असे कितीही अंध अनुयायी लोक एकत्र आले तरी त्याने समाज पुढे जात नाही. बुद्धीने आंधळे लोक संख्येने हजार असो, लाखो असो की करोडो असो.. त्यांचा कसलाही उपयोग जगाला सोडा, ते ज्या विचारप्रवाहाला अनुसरतात त्यालासुद्धा होत नाही.

स्वतःचा विचार आल्यापासून आजवर मी कधीही कुठल्याही विचारवंताला, नेत्याला किंवा धर्मसंस्थापकाला शरण गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी चुकूनही गांधीवादी नाही, हिंदुत्ववादी नाही की आंबेडकरवादी नाही. कुठल्याही एका विचारप्रवाहाला आयुष्य वाहून द्यायला स्वतःची चिकित्सक वृत्ती सोडून दयावी लागते आणि जीव गेला तरी मी ती सोडणार नाही. ही वृत्ती, हा आवाज आणि ही अक्कल खूप कष्टाने, संघर्षाने आणि प्रामाणिकपणातून आलेली आहे. अख्ख जग जरी विरोधात ठाकले तरी मी गप्प राहणार नाहीये. माझ्या बुद्धीच्या आकलनानुसार मी माझे सत्य, माझी मते मांडत राहणारच आहे. तुमची मजल फक्त मला, माझ्या आई-बहिणीला शिव्या देण्यापर्यंत किंवा जास्तीत जास्त मला संपवण्यापर्यंत जाईल... ज्याला मी भीक घालत नाही.

तुम्हाला माझे लिहिणे, बोलणे आक्षेपार्ह वाटत असेल, तर माझ्याविरुद्ध कायदेशीर तक्रार करा. जर मी चुक असेन तर मला शिक्षा होईलच की. आणि जर मी निर्दोष सुटलो तर टाकीन एक अब्रुनुकसानीचा दावा.

बाकी माझ्या मित्रयादीत स्थान कुणाला द्यायचे हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, बाकी कुणाचा हक्क नाही. आणि जर माझ्या वॉल वर येऊन कुणी मुद्दे सोडून वैयक्तिक टीका, शिवीगाळ करत असेल किंवा अशा प्रकारांना समर्थन देत असेल तर अशा व्यक्तीला काहीही उत्तर न देता उडवून लावायचा पूर्ण हक्क मला आहे. माझ्या शाळेपासूनच्या जिवलग मित्रांना सुद्धा मी FB मित्रयादीतून उडवून लावलंय जेव्हा त्यांनी वैयक्तिक टीका-टिपण्णी करायला सुरुवात केली तेव्हा. कुणाचा उपकार नाही माझ्यावर काहीही फालतू ऐकून घ्यायला.

मी शिव्यांना शिव्यांनी उत्तर देत नाही, कारण जगात नालायक लोक आहेत म्हणून मला त्यांच्या पातळीवर उतरायचे नाही. मी असली घाण अंगाला लावून घेत नाही, आणि त्या घाणीला समर्थन देणाऱ्या लोकांनाही जवळ करत नाही. जमिनीवर उतरून मी काय काम केलंय ते मला माहित आहे, मी त्याची FB वर टिमकी वाजवत नाही, तसली फालतू सवय मला नाही. आणि कुठल्याही राजकीय नेत्याला मी भीक घालत नाही, नाहीतर वडिलांचा मावसभाऊ असलेल्या विद्यमान केंद्रीय मंत्र्याला "संसदेत नीट बोलता येत नाही, ते मूर्ख आहेत" अशा अर्थाची जाहीर पोस्ट मी केली नसती.

माझ्या शिक्षणात, माझ्या नोकरीत, स्वतःच्या विकत घेतलेल्या घरात एकूण एक पैसा स्वतःच्या कष्टाचा, इमानेइतबारे केलेल्या कमाईचा आहे. कुणाची तरी घर जळावी, कुणाची तरी अब्रू लुटली जावी आणि त्यात माझी राजकीय चांदी व्हावी, असल्या नीच राजकारणाला, चळवळींना मी वाऱ्याला सुद्धा उभे करत नाही. मला कुणाच्याही सहाऱ्याची गरज नाही, आणि हे गेले 12 वर्ष मी जगून दाखवलंय. त्यामुळे तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. मला expose करण्याच्या वल्गना निरर्थक आहेत.

माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय घटनेने मला दिलंय. मी प्रश्न विचारणार, मी प्रश्न उभे करणार, मी माझी मते मांडणार.... हा माझा मूलभूत हक्क आहे. तुमचे लाडके नेते, पक्ष, जाती, राज्ये, धर्म तुम्ही कितीही मखरात घालून सजवले आणि अस्मितेचा प्रश्न बनवले तरीही मी त्यांना प्रश्न करणार. तुम्ही मला थांबवू शकत नाही. तो माझा घटनेने दिलेला हक्क आहे आणि संविधानानुसार तो हक्क तुमच्या समस्त नेत्यांपेक्षा, धर्मांपेक्षा मोठा आहे. आणि शिव्याशाप, वैयक्तिक टीका वगैरे दळण स्वतःच्या भिंतीवर घालायचे. माझ्या वॉलवर सुद्धा प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी पूर्णवेळ रिकामा नाहीये. माझे पोटापाण्याचे उदयोग वेगळे आहेत. मी कुणाला आमंत्रण दिलेलं नाहीये की या आणि मला FB वर follow करा म्हणून.

मी बोलणार आहे... यापुढे तुम्हीच काय, तुमचे समस्त नेते/देव स्वर्गातून/नरकातून खाली आले तरी मी प्रश्न उभा करणे थांबवणार नाहीये. आणि ज्यांना वाटते की "प्रश्न उभारून काय फायदा? त्याने जग बदलत नाही" त्यांनी जरा स्वतःचा अभ्यास वाढवावा, सहज कळून जाईल की अभिव्यक्तीमुळे जगात सत्ता उलथल्यात, कायदे बदललेत आणि मानवसामाज खऱ्या अर्थाने प्रगत झालाय. तेव्हा तुमच्या झुंडशाहीला मी बधणार नाहीये हे ध्यानात ठेवा आणि ऐकून घ्यायची सवय लावून घ्यायला शिका.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १ नोव्हेंबर २०१६, २२.०६ )

No comments:

Post a Comment