काही वर्षांपूर्वी माझ्या एका नामांकित स्त्री वकील मैत्रिणीसोबत स्त्रियांच्या हक्कांविषयी चर्चा करत होतो. हुंडा, घटस्फोट आदी विषयांवर गाडी आली तेव्हा ती म्हणाली,"विनय, भारतातले कायदे स्त्रियांच्या बाजूने खूपच biased झालेत. काहीही मनाविरुद्ध झालं की सासरच्या लोकांविरुद्ध टाकायची 498 (छळ) ची केस आणि मग जातात सगळे तुरुंगात. मी स्वतः स्त्री असले तरी कधी कधी मुद्दाम कायद्याच्या कचाट्यात फसवले गेलेल्या म्हाताऱ्या स्त्री-पुरुषांची दया येते." अगदी वर्षभर आधी सुप्रीम कोर्टाने या 498 च्या कलमात दुरुस्ती करत अटक करण्याबाबत काही निर्देश घालून दिले. मला वाटलं की जरा बरी परिस्थिती असेल आता खोट्या केसेस कमी होऊन. पण, तेवढ्यात परवा अजून ऐकायला मिळालं की माझ्या जवळच्या सभ्य मित्रावर, जो स्वतः मोठा सरकारी अधिकारी आहे, त्याच्यावर त्याच्या घटस्फोटास आतुर बायकोने 498 सोबत 377 (अनैसर्गिक संभोग) ची खोटी केस दाखल केली. आणि त्या बिचाऱ्याला सगळी कामे सोडून पोलीस स्टेशन ला जावे लागले, 10 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा असणाऱ्या 377 च्या अजामीनपात्र आरोपाला उत्तर द्यायला आणि नोकरी वाचवायला. 3 दिवस आधी टायफॉईड मधून बारा झालेला आणि डिस्चार्ज मिळालेला तो मित्र ज्या दुःखात जाणवला ते खरंच दयनीय होतं.
भारतात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात हे त्रिवार सत्य आहे. पण दुर्दैव हे की ज्या स्त्रियांवर हे अत्याचार होतात त्या बिचाऱ्या माउलींना कधी न्याय मिळतच नाही. त्यांची तक्रार ना पोलीस दाखल करून घेतात, ना त्यांच्या घरचे त्यांना कधी स्विकारतात, ना कुठला वकील त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहतो, ना कुठले हायकोर्ट/सुप्रीम कोर्ट त्यांच्यावरच्या अन्यायाची याचिका स्वतःहुन दाखल करून घेते, ना त्या कधी सामान्य आयुष्य जगू शकतात. कारण खूप सोपं आहे.... त्यांच्यावरचा अत्याचार कुठलाही मीडिया जगाला दाखवण्याच्या योग्य समजतच नाही, ना कुठला राजकीय पक्ष त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला गरजेचे समजतो. आदिवासी सोनी सोरी च्या गुप्तांगात खडे भरले जातात, तिच्याच समाजातील हिडमेवर तर सांगण्यापालिकडे अत्याचार होतात, खैरलांजीत प्रियांका भोतमांगे सामूहिक बलात्कार करून मारली जाते... होते काय? काहीही नाही!
आमच्या समाजात २ प्रकारच्या स्त्रिया असतात, शहरी, पांढरपेशा, उच्चवर्गीय, सुखवस्तू कुटुंबातल्या सुशिक्षित "आहे रे" वाल्या स्त्रिया आणि ग्रामीण, गरीब, अडाणी, रोजंदारीवर जगणाऱ्या "नाही रे" वाल्या स्त्रिया. जात-धर्म हे वर्गीकरण यात बसत नाही कारण स्त्री कुणाही जाती धर्मात असो, तिचा छळ ठरलेला आहे. फक्त गोष्ट एवढीच आहे की हा छळ मुख्यत्वे "नाही रे" वाल्या स्त्रियांचा असतो. "आहे रे" वाल्या स्त्रियांच्या बाबतीत पण अत्याचार होतात पण त्यावर त्यांना पोलीस, कायदा आदींचे संरक्षण सहज मिळते कारण सगळे पर्याय सहज उपलब्ध असतात, मीडिया लगेच पाठीशी उभा राहून प्रसंगी न्यायव्यवस्थेवर सुद्धा अप्रत्यक्ष दबाव आणतो आणि राजकारण जर मध्ये आले तर अजूनच झटपट न्याय! पण "नाही रे" गटातल्या स्त्रियांना यातलं काहीच मिळत नाही. कारण मुळात त्यांचं अस्तित्वच नगण्य असते सगळ्या यंत्रणेसाठी, वरून त्यांना ना अधिकाराची जाणीव असते, आणि जरी जाणीव असली तरी कसलेच पाठबळ नाही. मग काय करा? तर सहन करा... अगदी साधी तक्रार सुद्धा दाखल न होता.
"नाही रे" वर्गातल्या स्त्रियांवर होणाऱ्या सततच्या अत्याचाराला आमच्या देशातल्या नालायक पुरुषांइतक्याच स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे अधिकार याबद्दल निवडक कंठशोष करणाऱ्या बेगडी आणि भंपक महिला संघटना आणि कार्यकर्त्या सुद्धा जबाबदार आहेत. या महिला संघटना व कार्यकर्त्या फक्त "आहे रे" वर्गातल्या स्त्रियांसाठी कार्यरत असतात. म्हणजे राखी सावंत चा मिका ने मुका घेतला की या रस्त्यावर उतरतात, पण त्याच वेळेस मुंबईत एका झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रीची धिंड काढलेली यांना माहित पण नसते. राखी सोबत ग्लॅमर आहे ना! आरुषी तलवार चा दुर्दैवी खून झाला की सगळ्या मेणबत्ती घेऊन रस्त्यावर, पण प्रियांका भोतमांगे साठी एक टिपूस या गाळणार नाहीत. बिग बॉस च्या घरात कुणा महिलेला कुणी काही बोललं की या लगेच सायंकाळी TV वर तावातावाने स्त्री हक्काचे राग आलापणार, पण देशात इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी विषयांवर मात्र या शांत! कसंय ना, कि खूप सरकार/व्यवस्थे विरोधात बोललं की मग "महिला आयोगावर" नेमणूक होत नाही, NGO ला पैसे मिळत नाहीत, UN मध्ये वगैरे भाषण द्यायला पाठवलं जात नाही.... म्हणून आपलं बेताने बोलायचं. दुकान पण चाललं पाहिजे आणि हेतूंवर शंका पण आली नाही पाहिजे!
या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्त्या आणि संघटना अगदी सहज ओळखू येतात. एकतर यांच्यावर वैयक्तिक कुठलाही विशेष अन्याय (कुठल्यातरी भंपक देवळात, दर्ग्यात नाकारलेला प्रवेश सोडून) कधी झालेला नसतो, त्यामुळे अत्याचाराने पीडित स्त्रियांबद्दल सहानुभूती, कणव, empathy वगैरे काही प्रकार नसतातच. डिझायनर जाकीट, फॅशनेबल कुर्ते-ऍक्सेसरीज वगैरे घालून, उंची गाड्यातून फिरत, तारांकित हॉटेलात कॉकटेल पार्ट्या झोडत या महामहिम स्त्रिया देशातल्या स्त्रियांच्या हक्कावर त्वेषाने चर्चा करतात. तोच त्वेष पुढे TV वरच्या चर्चांमध्ये, मीडिया समोर दाखवत आपले व आपल्या NGO चे बस्तान बसवून घेतात. १-२ केसेस मध्ये नाव मिळवण्यासाठी चांगलं काम करून दाखवून पूढे त्या १-२ केसेस चा जोगवा मागत आयुष्यभर निवांत घालवतात. सरकारी समित्या, विद्यापीठे अशा ठिकाणी चिकटून जातात कायमच्या. नशीब बलवत्तर असेल तर राजकारणात पण चमकतात आणि अगदी राज्यपाल वगैरे पण होतात.
समस्त पुरुषांना stereotype करणे हा या बायकांचा आवडता छंद! म्हणजे त्या तुम्हाला विनाकारण पातळी सोडून काहीही बोलल्या, तुमच्यावर काहीही अनिर्बंध, खोटेनाटे आरोप केले, तुमच्याशी कुचेष्टेने वागल्या तरी पुरुषांनी शांत बसायचं. तुम्ही चुकून काही प्रत्युत्तर दिले की मात्र लगेच तुमच्यावर patriarchy (पुरुषसत्ताक), misogyny (स्त्रीद्वेष) चा शिक्का मारून मोकळ्या! हो ना, एखाद्या पुरुषाने आयुष्यात कितीही स्त्रियांवर वेगवेगळ्या स्वरूपात प्रेम केले, त्यांना समानतेने वागवले, त्यांना आदर दिला, त्यांच्या आरोग्य-शिक्षण-मूलभूत हक्क आदी गोष्टींना इमानेइतबारे समर्थन दिले .... आणि जर तो पुरुष एखाद्या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्तीच्या एका जरी विचाराशी असहमत असला की लगेच तो पुरुषी व्यवस्थेचा पाईक, स्त्रीद्वेष्टा वगैरे वगैरे! मीसुद्धा अलीकडेच हा अनुभव हा घेतला. आणि असल्या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्तींची तळी उचलायला काही पुरुष पण लगेच तयार असतात, कसलाही पुढचा मागचा विचार न करता. खूप फायदे असतात त्याचे... काहीही कार्य न करता थेट स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्ती, संघटनांकडून तुम्ही किती उदार, महान, आदर्श पुरुष आहात याचे प्रशस्तीपत्र लागलीच मिळते!
तर हे समस्त स्त्रीमुक्ती आणि समानतेच्या पोकळ गप्पा ठोकणाऱ्या स्त्री-पुरुषांनो, तुमच्यामुळे जगात किंवा देशात काहीही फरक पडला नाहीये, कारण मुळात तुमच्याच लेखी "आहे रे" वर्गातल्या स्त्रीच्या सामान्य हक्काच्या भंगाला "नाही रे" वर्गातल्या स्त्रीच्या अस्तित्वापेक्षाही जास्त किंमत आहे. तुमच्या घरात घरकाम करणाऱ्या स्त्रीला ऍनिमिया आहे हे तुम्हाला माहित नसते, तिला आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यायची तुमची तयारी नसते, अगदी तिच्या मासिक पाळीच्या काळात सुद्धा! तुमच्या उच्चभ्रू सोसायटीत तर घरकाम करणाऱ्या बायकांनी लिफ्ट सुद्धा वापरायची नसते म्हणे! तिने कधी तुमच्या सोफ्यावर बसायचे नाही की तुमच्या कपात चहा प्यायचा नाही. आणि तुमचे बाथरूम वापरणे... ते तर चुकूनही नाही! जिथे तुमच्या घरात राबणाऱ्या "नाही रे" वर्गातल्या स्त्रीबद्दल तुम्ही इतके निर्ढावलेले असता तिथे तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला जाऊ नका, हसू येते!
स्त्री-पुरुष समानतेच्या आणि स्त्रियांच्या हक्काच्या गप्पा मारताना समस्त पुरुषांना sterotype करत दूषणे देणाऱ्या दांभिकांनो, या देशातले बहुतांश पुरुष नक्कीच चांगले आहेत. कधी बहुतांश पुरुषांकडेही बघा रेल्वेत, बसमध्ये एखादया गरोदर किंवा वृद्ध स्त्रीला स्वतः उठून जागा करून देताना, रस्त्याकडेला भाजी-फुले विकणाऱ्या स्त्रीला मावशी/ताई म्हणत तिला समाजात वावरायला सुरक्षित वातावरण निर्माण करून देताना, रस्त्याने एकट्या जाणाऱ्या अनोळखी लहान मुलींना रस्ता ओलांडताना मदत करताना, कुणा रोडरोमिओने मुलीची छेड काढल्यास त्याला धुतानाही! फुलेंपासून कर्वेंपर्यंत आणि आंबेडकरांपासून हिमांशूकुमार पर्यंत सगळे पुरुषच आहेत की! १% विकृत पुरुषांसाठी सगळ्या पुरुषांना नावे ठेवताना परत एकदा विचार करा, कारण संख्येने तेवढ्याच टक्के विकृत स्त्रिया सुद्धा आहेत. काही भांडकुदळ, भंपक, बेगडी स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वाल्या कार्यकर्तींसाठी बहुतांश पुरुष समस्त स्त्रिजातीला अजून तरी sterotype करत नाहीत. कसं आहे ना, बहुतांश पुरुष हे लक्षात ठेवून असतात की त्यांच्याही घरी काही प्रेमळ स्त्रिया आहेत, जे तुम्ही स्त्रीमुक्ती वाले स्वतःच्या घरातल्या पुरुषांबद्दल विसरून गेलाय!
तेव्हा हे दांभिकांनो, तुम्हाला एक सांगावेसे वाटते की तुम्ही म्हणजे समस्त स्त्रीजात किंवा स्त्रीजातीचे कैवारी नाही आहात, ना तुम्हाला कुणी मक्ता दिलाय की फक्त तुम्हीच स्त्रियांबद्दल बोलावे आणि तुमच्या विरोधात बोलणाऱ्या कुणावर काहीही आरोप करून मोकळे व्हावे. तुम्ही holy cow नाही आहात आणि तुमच्या "आहे रे" आणि "नाही रे" वाल्या स्त्रियांमधल्या भेदभाव करणाऱ्या पांढरपेशा जाणिवांना, तुमच्या कर्तृत्वशून्य वायफळ बडबडीला विरोध करणे हा आमचाही हक्क आहे. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय-नोकरी, मूलभूत हक्क आदी महत्वाच्या गोष्टी सोडून मूठभर "आहे रे" वाल्या स्त्रियांच्या काहीतरी फालतू वैयक्तिक गोष्टींवर समाजाचे, न्यायव्यवस्थेचे, मीडियाचे लक्ष विचलित करून तुम्ही खऱ्या स्त्री-मुक्तीच्या मुद्द्यांना स्वतःच्या टीचभर स्वार्थासाठी अडगळीत फेकून देताय. "आहे रे" वर्गाच्या दिखाऊ ऍलर्जीने "नाही रे" वर्गाच्या कँसर ला सुद्धा झाकोळून टाकलंय. आणि स्त्रीमुक्तीच्या नावाखाली असल्या आक्रस्ताळी, पूर्वग्रहदूषित पुरुषद्वेषाला विरोध हा होणारच! स्त्री-पुरुष समानता टीका ऐकून घेताना पण लागू होते बरं का!
- डॉ. विनय काटे