Tuesday, January 31, 2017

स्त्रीमुक्ती - नेमकी कुणाची ???

काही वर्षांपूर्वी माझ्या एका नामांकित स्त्री वकील मैत्रिणीसोबत स्त्रियांच्या हक्कांविषयी चर्चा करत होतो. हुंडा, घटस्फोट आदी विषयांवर गाडी आली तेव्हा ती म्हणाली,"विनय, भारतातले कायदे स्त्रियांच्या बाजूने खूपच biased झालेत. काहीही मनाविरुद्ध झालं की सासरच्या लोकांविरुद्ध टाकायची 498 (छळ) ची केस आणि मग जातात सगळे तुरुंगात. मी स्वतः स्त्री असले तरी कधी कधी मुद्दाम कायद्याच्या कचाट्यात फसवले गेलेल्या म्हाताऱ्या स्त्री-पुरुषांची दया येते." अगदी वर्षभर आधी सुप्रीम कोर्टाने या 498 च्या कलमात दुरुस्ती करत अटक करण्याबाबत काही निर्देश घालून दिले. मला वाटलं की जरा बरी परिस्थिती असेल आता खोट्या केसेस कमी होऊन. पण, तेवढ्यात परवा अजून ऐकायला मिळालं की माझ्या जवळच्या सभ्य मित्रावर, जो स्वतः मोठा सरकारी अधिकारी आहे, त्याच्यावर त्याच्या घटस्फोटास आतुर बायकोने 498 सोबत 377 (अनैसर्गिक संभोग) ची खोटी केस दाखल केली. आणि त्या बिचाऱ्याला सगळी कामे सोडून पोलीस स्टेशन ला जावे लागले, 10 वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा असणाऱ्या 377 च्या अजामीनपात्र आरोपाला उत्तर द्यायला आणि नोकरी वाचवायला. 3 दिवस आधी टायफॉईड मधून बारा झालेला आणि डिस्चार्ज मिळालेला तो मित्र ज्या दुःखात जाणवला ते खरंच दयनीय होतं.

भारतात स्त्रियांवर अनन्वित अत्याचार होतात हे त्रिवार सत्य आहे. पण दुर्दैव हे की ज्या स्त्रियांवर हे अत्याचार होतात त्या बिचाऱ्या माउलींना कधी न्याय मिळतच नाही. त्यांची तक्रार ना पोलीस दाखल करून घेतात, ना त्यांच्या घरचे त्यांना कधी स्विकारतात, ना कुठला वकील त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहतो, ना कुठले हायकोर्ट/सुप्रीम कोर्ट त्यांच्यावरच्या अन्यायाची याचिका स्वतःहुन दाखल करून घेते, ना त्या कधी सामान्य आयुष्य जगू शकतात. कारण खूप सोपं आहे.... त्यांच्यावरचा अत्याचार कुठलाही मीडिया जगाला दाखवण्याच्या योग्य समजतच नाही, ना कुठला राजकीय पक्ष त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला गरजेचे समजतो. आदिवासी सोनी सोरी च्या गुप्तांगात खडे भरले जातात, तिच्याच समाजातील हिडमेवर तर सांगण्यापालिकडे अत्याचार होतात, खैरलांजीत प्रियांका भोतमांगे सामूहिक बलात्कार करून मारली जाते... होते काय? काहीही नाही!

आमच्या समाजात २ प्रकारच्या स्त्रिया असतात, शहरी, पांढरपेशा, उच्चवर्गीय, सुखवस्तू कुटुंबातल्या सुशिक्षित "आहे रे" वाल्या स्त्रिया आणि ग्रामीण, गरीब, अडाणी, रोजंदारीवर जगणाऱ्या "नाही रे" वाल्या स्त्रिया. जात-धर्म हे वर्गीकरण यात बसत नाही कारण स्त्री कुणाही जाती धर्मात असो, तिचा छळ ठरलेला आहे. फक्त गोष्ट एवढीच आहे की हा छळ मुख्यत्वे "नाही रे" वाल्या स्त्रियांचा असतो. "आहे रे" वाल्या स्त्रियांच्या बाबतीत पण अत्याचार होतात पण त्यावर त्यांना पोलीस, कायदा आदींचे संरक्षण सहज मिळते कारण सगळे पर्याय सहज उपलब्ध असतात, मीडिया लगेच पाठीशी उभा राहून प्रसंगी न्यायव्यवस्थेवर सुद्धा अप्रत्यक्ष दबाव आणतो आणि राजकारण जर मध्ये आले तर अजूनच झटपट न्याय! पण "नाही रे" गटातल्या स्त्रियांना यातलं काहीच मिळत नाही. कारण मुळात त्यांचं अस्तित्वच नगण्य असते सगळ्या यंत्रणेसाठी, वरून त्यांना ना अधिकाराची जाणीव असते, आणि जरी जाणीव असली तरी कसलेच पाठबळ नाही. मग काय करा? तर सहन करा... अगदी साधी तक्रार सुद्धा दाखल न होता.

"नाही रे" वर्गातल्या स्त्रियांवर होणाऱ्या सततच्या अत्याचाराला आमच्या देशातल्या नालायक पुरुषांइतक्याच स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे अधिकार याबद्दल निवडक कंठशोष करणाऱ्या बेगडी आणि भंपक महिला संघटना आणि कार्यकर्त्या सुद्धा जबाबदार आहेत. या महिला संघटना व कार्यकर्त्या फक्त "आहे रे" वर्गातल्या स्त्रियांसाठी कार्यरत असतात. म्हणजे राखी सावंत चा मिका ने मुका घेतला की या रस्त्यावर उतरतात, पण त्याच वेळेस मुंबईत एका झोपडपट्टीत राहणाऱ्या स्त्रीची धिंड काढलेली यांना माहित पण नसते. राखी सोबत ग्लॅमर आहे ना! आरुषी तलवार चा दुर्दैवी खून झाला की सगळ्या मेणबत्ती घेऊन रस्त्यावर, पण प्रियांका भोतमांगे साठी एक टिपूस या गाळणार नाहीत. बिग बॉस च्या घरात कुणा महिलेला कुणी काही बोललं की या लगेच सायंकाळी TV वर तावातावाने स्त्री हक्काचे राग आलापणार, पण देशात इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बालविवाह, स्त्रीभ्रूणहत्या इत्यादी विषयांवर मात्र या शांत! कसंय ना, कि खूप सरकार/व्यवस्थे विरोधात बोललं की मग "महिला आयोगावर" नेमणूक होत नाही, NGO ला पैसे मिळत नाहीत, UN मध्ये वगैरे भाषण द्यायला पाठवलं जात नाही.... म्हणून आपलं बेताने बोलायचं. दुकान पण चाललं पाहिजे आणि हेतूंवर शंका पण आली नाही पाहिजे!

या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्त्या आणि संघटना अगदी सहज ओळखू येतात. एकतर यांच्यावर वैयक्तिक कुठलाही विशेष अन्याय (कुठल्यातरी भंपक देवळात, दर्ग्यात नाकारलेला प्रवेश सोडून) कधी झालेला नसतो, त्यामुळे अत्याचाराने पीडित स्त्रियांबद्दल सहानुभूती, कणव, empathy वगैरे काही प्रकार नसतातच. डिझायनर जाकीट, फॅशनेबल कुर्ते-ऍक्सेसरीज वगैरे घालून, उंची गाड्यातून फिरत, तारांकित हॉटेलात कॉकटेल पार्ट्या झोडत या महामहिम स्त्रिया देशातल्या स्त्रियांच्या हक्कावर त्वेषाने चर्चा करतात. तोच त्वेष पुढे TV वरच्या चर्चांमध्ये, मीडिया समोर दाखवत आपले व आपल्या NGO चे बस्तान बसवून घेतात. १-२ केसेस मध्ये नाव मिळवण्यासाठी चांगलं काम करून दाखवून पूढे त्या १-२ केसेस चा जोगवा मागत आयुष्यभर निवांत घालवतात. सरकारी समित्या, विद्यापीठे अशा ठिकाणी चिकटून जातात कायमच्या. नशीब बलवत्तर असेल तर राजकारणात पण चमकतात आणि अगदी राज्यपाल वगैरे पण होतात.

समस्त पुरुषांना stereotype करणे हा या बायकांचा आवडता छंद! म्हणजे त्या तुम्हाला विनाकारण पातळी सोडून काहीही बोलल्या, तुमच्यावर काहीही अनिर्बंध, खोटेनाटे आरोप केले, तुमच्याशी कुचेष्टेने वागल्या तरी पुरुषांनी शांत बसायचं. तुम्ही चुकून काही प्रत्युत्तर दिले की मात्र लगेच तुमच्यावर patriarchy (पुरुषसत्ताक), misogyny (स्त्रीद्वेष) चा शिक्का मारून मोकळ्या! हो ना, एखाद्या पुरुषाने आयुष्यात कितीही स्त्रियांवर वेगवेगळ्या स्वरूपात प्रेम केले, त्यांना समानतेने वागवले, त्यांना आदर दिला, त्यांच्या आरोग्य-शिक्षण-मूलभूत हक्क आदी गोष्टींना इमानेइतबारे समर्थन दिले .... आणि जर तो पुरुष एखाद्या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्तीच्या एका जरी विचाराशी असहमत असला की लगेच तो पुरुषी व्यवस्थेचा पाईक, स्त्रीद्वेष्टा वगैरे वगैरे! मीसुद्धा अलीकडेच हा अनुभव हा घेतला. आणि असल्या भंपक स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्तींची तळी उचलायला काही पुरुष पण लगेच तयार असतात, कसलाही पुढचा मागचा विचार न करता. खूप फायदे असतात त्याचे... काहीही कार्य न करता थेट स्त्रीमुक्ती वाल्या कार्यकर्ती, संघटनांकडून तुम्ही किती उदार, महान, आदर्श पुरुष आहात याचे प्रशस्तीपत्र लागलीच मिळते!

तर हे समस्त स्त्रीमुक्ती आणि समानतेच्या पोकळ गप्पा ठोकणाऱ्या स्त्री-पुरुषांनो, तुमच्यामुळे जगात किंवा देशात काहीही फरक पडला नाहीये, कारण मुळात तुमच्याच लेखी "आहे रे" वर्गातल्या स्त्रीच्या सामान्य हक्काच्या भंगाला "नाही रे" वर्गातल्या स्त्रीच्या अस्तित्वापेक्षाही जास्त किंमत आहे. तुमच्या घरात घरकाम करणाऱ्या स्त्रीला ऍनिमिया आहे हे तुम्हाला माहित नसते, तिला आठवड्यातून एक दिवस सुट्टी द्यायची तुमची तयारी नसते, अगदी तिच्या मासिक पाळीच्या काळात सुद्धा! तुमच्या उच्चभ्रू सोसायटीत तर घरकाम करणाऱ्या बायकांनी लिफ्ट सुद्धा वापरायची नसते म्हणे! तिने कधी तुमच्या सोफ्यावर बसायचे नाही की तुमच्या कपात चहा प्यायचा नाही. आणि तुमचे बाथरूम वापरणे... ते तर चुकूनही नाही! जिथे तुमच्या घरात राबणाऱ्या "नाही रे" वर्गातल्या स्त्रीबद्दल तुम्ही इतके निर्ढावलेले असता तिथे तुम्ही चुकूनही दुसऱ्यांना शहाणपण शिकवायला जाऊ नका, हसू येते!

स्त्री-पुरुष समानतेच्या आणि स्त्रियांच्या हक्काच्या गप्पा मारताना समस्त पुरुषांना sterotype करत दूषणे देणाऱ्या दांभिकांनो, या देशातले बहुतांश पुरुष नक्कीच चांगले आहेत. कधी बहुतांश पुरुषांकडेही बघा रेल्वेत, बसमध्ये एखादया गरोदर किंवा वृद्ध स्त्रीला स्वतः उठून जागा करून देताना, रस्त्याकडेला भाजी-फुले विकणाऱ्या स्त्रीला मावशी/ताई म्हणत तिला समाजात वावरायला सुरक्षित वातावरण निर्माण करून देताना, रस्त्याने एकट्या जाणाऱ्या अनोळखी लहान मुलींना रस्ता ओलांडताना मदत करताना, कुणा रोडरोमिओने मुलीची छेड काढल्यास त्याला धुतानाही! फुलेंपासून कर्वेंपर्यंत आणि आंबेडकरांपासून हिमांशूकुमार पर्यंत सगळे पुरुषच आहेत की! १% विकृत पुरुषांसाठी सगळ्या पुरुषांना नावे ठेवताना परत एकदा विचार करा, कारण संख्येने तेवढ्याच टक्के विकृत स्त्रिया सुद्धा आहेत. काही भांडकुदळ, भंपक, बेगडी स्त्रीमुक्ती, स्त्री-पुरुष समानता वाल्या कार्यकर्तींसाठी बहुतांश पुरुष समस्त स्त्रिजातीला अजून तरी sterotype करत नाहीत. कसं आहे ना, बहुतांश पुरुष हे लक्षात ठेवून असतात की त्यांच्याही घरी काही प्रेमळ स्त्रिया आहेत, जे तुम्ही स्त्रीमुक्ती वाले स्वतःच्या घरातल्या पुरुषांबद्दल विसरून गेलाय!

तेव्हा हे दांभिकांनो, तुम्हाला एक सांगावेसे वाटते की तुम्ही म्हणजे समस्त स्त्रीजात किंवा स्त्रीजातीचे कैवारी नाही आहात, ना तुम्हाला कुणी मक्ता दिलाय की फक्त तुम्हीच स्त्रियांबद्दल बोलावे आणि तुमच्या विरोधात बोलणाऱ्या कुणावर काहीही आरोप करून मोकळे व्हावे. तुम्ही holy cow नाही आहात आणि तुमच्या "आहे रे" आणि "नाही रे" वाल्या स्त्रियांमधल्या भेदभाव करणाऱ्या पांढरपेशा जाणिवांना, तुमच्या कर्तृत्वशून्य  वायफळ बडबडीला विरोध करणे हा आमचाही हक्क आहे. आरोग्य, शिक्षण, व्यवसाय-नोकरी, मूलभूत हक्क आदी महत्वाच्या गोष्टी सोडून मूठभर "आहे रे" वाल्या स्त्रियांच्या काहीतरी फालतू वैयक्तिक गोष्टींवर समाजाचे, न्यायव्यवस्थेचे, मीडियाचे लक्ष विचलित करून तुम्ही खऱ्या स्त्री-मुक्तीच्या मुद्द्यांना स्वतःच्या टीचभर स्वार्थासाठी अडगळीत फेकून देताय. "आहे रे" वर्गाच्या दिखाऊ ऍलर्जीने "नाही रे" वर्गाच्या कँसर ला सुद्धा झाकोळून टाकलंय. आणि स्त्रीमुक्तीच्या नावाखाली असल्या आक्रस्ताळी, पूर्वग्रहदूषित पुरुषद्वेषाला विरोध हा होणारच! स्त्री-पुरुष समानता टीका ऐकून घेताना पण लागू होते बरं का!

- डॉ. विनय काटे

Wednesday, January 25, 2017

वाचन कौशल्य

Reading Comprehension अर्थात लिहिलेलं वाचणे, त्यावर विचार करणे आणि त्याचा योग्य अर्थ समजून घेणे हे आत्मसात करायला खूप अवघड कौशल्य आहे. म्हणून UPSC असो, CAT असो की अजून कुठलीही स्पर्धा परीक्षा, त्यात उमेदवारांची ही क्षमता तपासण्यासाठी काही प्रश्न नक्की असतात.

कुठलेही वाक्य हे नीट न वाचता, नीट विचार न करता आणि नीट अर्थ समजून न घेतल्याने अनर्थ होतात. हे अनर्थ वैयक्तिक आयुष्यापासून ते सार्वजनिक आयुष्यापर्यंत घातक असतात. काही लोकांकडे हे कौशल्य अजिबात नसते त्यामुळे ते नजरचुकीने, अनावधानाने अर्थाचा अनर्थ करतात. 

काही धूर्त आणि स्वार्थी लोक जाणूनबुजून हे कौशल्य चुकीच्या पद्धतीने वापरत अर्थाचा अनर्थ करतात. जगातल्या साऱ्या दंगली-युद्धे, धार्मिक-जातीय तेढ, विद्वेषाचे वातावरण ही या धूर्त आणि पराकोटीच्या स्वार्थी लोकांची देण आहे. असे लोक इतिहाससंशोधन, कला-साहित्य, राजकारण, माध्यमे अशा विविध सामाजिक क्षेत्रांत आघाडीवर असतात ती याच कौशल्याने. कुणी काहीही बोलू द्या, त्या वाक्याचा अनर्थ करत प्रसंगी लोकांच्या चितेवर सुद्धा या लोकांना आपली पोळी भाजायची कला अवगत असते.

अज्ञानी लोकांना समजावता येते. धूर्त व स्वार्थी लोकांना कधीच समजावता येत नाही कारण त्यांचे पोट अनर्थ होण्याने भरत असते.

- डॉ. विनय काटे

Sunday, January 22, 2017

नथुरामास बापूंचे पत्र

प्रिय नथुराम,

तुला "प्रिय" म्हणतोय म्हणून आश्चर्य अजिबात वाटून घेऊ नकोस कारण मला तुझाच काय कुणाचाही द्वेष करता येत नाही. हवं तर ह्याला माझी अगतिकता समज किंवा माझा ढोंगीपणा, पण द्वेषाच्या भावनेवर मात करायला खूप कष्ट घेतलेत मी. ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं त्या ब्रिटिशांच्या २३ पोलिसांना जेव्हा चौरी-चौरा मध्ये "असहकार आंदोलन" मध्ये जिवंत जाळले गेले तेव्हा मी ते आंदोलनच मागे घेतलं आणि प्रायश्चित्त केलं. माझा लढा ब्रिटिश राज्याविरुद्ध होता, ब्रिटिशांविरुद्ध नव्हताच मुळी!

३० जानेवारी १९४८ ला जेव्हा तू  माझ्या छातीत ३ गोळ्या झाडून मोकळा झालास त्यादिवशी तुझं आणि माझं नाव कायमचं जोडलं गेलं इतिहासात. पण माझ्या देहाला मारून तू माझा विचार संपवू शकत नाहीस, हे तुला कुणी समजावून कसं सांगितलं नाही याचं खरंच खूप दुःख वाटतं, अगदी तुझ्या गोळ्यांनी दिलेल्या वेदनेपेक्षा जास्त! आणि माझा विचार तरी माझा एकट्याचा कुठे होता अरे? महावीर, बुद्ध आणि येशूची अहिंसा घेऊन मी हृदयात घेऊन चालत होतो. ते तिघेही मेले पण त्यांचे विचार हजारो वर्षे संपले नाहीत, मग माझ्या मरणाने असा कोणता मोठा आघात तू त्या चिरंतन विचारांवर करणार होतास? तुझी फाशी दुसऱ्या शिक्षेत बदलावी म्हणून माझ्या मुलांनी सरकारकडे याचना केली पण दुर्दैवाने तसं झालं नाही. तसं झालं असतं तर कदाचित तू अमेरिकेतल्या मार्टिन ला आणि आफ्रिकेतल्या नेल्सनला पाहू शकला असतास त्या बुद्ध, महावीर, येशूच्या अहिंसेने क्रांती घडवताना. तेवढं आयुष्य नक्कीच शिल्लक होतं तुझं!

तुझ्यावर खटला चालवताना म्हणे कोर्टाने तुला आठवडाभर तुझी बाजू मांडायची संधी दिली. तशीच माझी बाजू मांडायची संधी जर तू जर मला दिली असतीस तर मी खात्रीने सांगतो की तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी यथाशक्ती देऊ शकलो असतो, तुझ्या प्रत्येक शंकेच निरसन मी करू शकलो असतो आणि कदाचित तुझ्यातल्या उर्जेला एका विधायक मार्गाने व्यक्त व्हायला मार्गही देऊ शकलो असतो. बरं झालं अंगुलीमालकडे तेव्हा बॅरेटाची रिव्हॉल्वर नव्हती, नाहीतर तो बुद्ध एकही प्रश्न विचारायच्या आधीच संपला असता माझ्यासारखा आणि तो अंगुलीमाल कायमचा खुनीच राहिला असता. तंत्रज्ञानातील प्रगती अविचारी माणसाचा घात करते ती अशी!

मला कळले की तुला म्हणे एक हिंदुराष्ट्र निर्माण करायचे होते. पण मला अजून समजले नाही की मला मारून तू हे तुझे ध्येय साध्य कसे करणार होतास? ना मी कुठल्या पक्षात होतो, ना मी कुठल्या धर्माची धुरा वाहत होतो. आणि हिंदू धर्माच बोलशील तर मी तर आजन्म हिंदू म्हणून जगलो. फरक फक्त एवढाच आहे की मी ज्या हिंदू धर्मात जगलो त्यात मला दुसऱ्या धर्मांच्या लोकांप्रती द्वेष नाही तर प्रेम करायची शिकवण मिळाली होती, त्यांच्याशी शांततापूर्ण सहजीवनात जगायची कला शिकवली होती. तुझ्या कल्पनेतला हिंदू धर्म मला तरी अकल्पित आणि भयानक वाटतो बाबा!

मला अजूनही एका गोष्टीचं खूप वाईट वाटत तुझ्या बाबतीत, ते म्हणजे तुझ्या एकटे पडण्याचं. मला मरून कित्येक दशके झाली तरी जगभरातील लोक मला त्यांच्या आयुष्याचा भाग मानतात, माझ्या नावाने तिकिटे छापतात, रस्ते बांधतात. पण तुला मात्र खूप उपेक्षा सहन करावी लागली, जन्मभर आणि मृत्यूनंतर पण! ज्यांनी तुला मला मारण्यासाठी तयार केलं त्यांनी तू त्यात यशस्वी झाल्यावरसुद्धा तुझं पालकत्वच नाकारलं! तू कदाचित तेव्हा समजून घेतलं असशील की संघटना वाचावी म्हणून ते हा त्याग करतायत, पण आज त्या घटनेला 70 वर्षे होत आली तरीही ते तुझा संबंधच नाकारतात त्यांच्याशी. आणि उलटपक्षी माझा चरखा घेऊन फोटो काढतात आणि जगभर भाषणे देताना माझाच उल्लेख करतात. तुझा वापर करून नंतर तुला इतकं वाऱ्यावर टाकून दिलेलं मलासुद्धा पाहवत नाही. जन्मलेल्या मुलांना सुद्धा कोणी नथुराम असं नाव ठेवत नाही आजकाल. कसं सहन करतोस रे हे सगळं?

एका मर्त्य मानवाने, दुसऱ्या मर्त्य मानवाला जीवे मारून जगात कुठला विचार संपलाय आजवर? मला माहित आहे की तुझ्या गोळ्यांनी मला मरण आले तरी माझा विचार संपलेला नाहीये, आणि माझ्या खुनाची शिक्षा म्हणून तुला फासावर चढवून तुझा विचार पण अजून संपलेला नाहीये. येशूला मारताना तो त्याच्या मारेकऱ्यांसाठी देवाकडे क्षमायाचना करत होता, मला तेवढा तरी वेळ द्यायचा होतास तू की मी तुला माफ करण्यासाठी मी चार शब्द तरी बोलू शकलो असतो. कदाचित विनोबाला सांगू शकलो असतो की या मुलाला थोडं प्रेम द्या, ज्ञान द्या आणि सोबत ठेवा स्वतःच्या. तुझेही आयुष्य बदलले असते त्याने आणि तुला अमूलाग्र बदललेला पाहून येणाऱ्या काळातली मुलेही तुझ्यासारखी वाट चुकली नसती. कदाचित पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांच्या डोक्यात गोळ्या उतारणारे हात कधी तयारच झाले नसते. तुझा आततायी विचार तुझ्याचकरवी मारायची ताकद माझ्या विचारांत नक्कीच होती, पण दुर्दैव की तुला ती संधी द्यायला मी शिल्लक नव्हतो.

नथुरामा, तुझी अवस्था पाहून खरंच खूप दुःख वाटते रे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारतदर्शनाला, इंग्लंडला आणि नोआखाली ला सुद्धा. दाखवलं असतं तुला या जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या आनंदाची, सुखाची, शांततेची आणि मानवतेची जी या द्वेषाच्या वणव्याला विझवून टाकायची शाश्वत शक्ती ठेवून असते. कदाचित तुझ्यामधून एखादा विनोबा, एखादा नेल्सन, एखादा मार्टिन सुद्धा निर्माण करू शकलो असतो. पण आता सगळंच तुझ्या आणि माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणे हे नेहमीच खूप अवघड आहे हे मला माहित आहे, तुला अनुसरणे मात्र आजकाल खूप सोपं झालंय. इतकं सोपं झालंय की मला आदर्श मानणारेही आता तुझ्या शैलीत विरोधकांचे आवाज बंद करतायत!

नथुरामा, कालाय तस्मै नमः !

तुझा प्रिय,
बापू

- डॉ. विनय काटे

Saturday, January 21, 2017

छडा - एक आवर्जून पाहावं असं नाटक

मराठी नाटकाला एक मोठी परंपरा आहे. हलक्या-फुलक्या विनोदी अंगाच्या नाटकांपासून ते अगदी आशयघन सामाजिक नाटकांपर्यंत वेगवेगळी असंख्य नाटके मराठी नाट्यक्षेत्राने अनुभवली. मात्र रहस्यकथा असणारी नाटके संख्येने फारच कमी स्टेजवर आली. रहस्यकथा हाताळताना लागणारे व गूढ कायम ठेवणारे संवाद, पात्रांना द्यावा लागणारा पुरेसा वेळ हा एक कळीचा प्रश्न असतो. त्याचबरोबर ध्वनी-संगीत, प्रकाश, रंगमंच आणि नेपथ्य यांचा नाटकासाठी असणारा मर्यादितपणा हे सांभाळून रहस्यमय नाटक उभे करणे हे एक मोठे दिव्य असते.

याच आठवड्यात सुरेश जयराम लिखित आणि मंगेश कदम दिग्दर्शित "छडा" हे दोन अंकी नाटक पाहण्याचा योग आला. कथेत पात्रे मोजून 4, शेखर व कांचन हे नवरा बायको, नेहा ही त्यांची शेजारीण आणि अनुराधा. शेखर हा प्रथितयश TV अभिनेता तर कांचन मानसिक तणावांमुळे करिअरमध्ये अर्धविराम घेत मानसोपचार तज्ज्ञाकडून औषधोपचार घेतेय. शेखर आणि कांचन मध्ये सर्व काही सुरळीत नाहीये, पण एक सामायिक गुपित त्यांना वेगळे होण्यापासून थांबवत असते. शेजारीण नेहा ही शेखरची मोठी फॅन असते आणि तिच्या शेखरसोबतच्या आगळिकीने आधीच वैतागलेली कांचन अजून वैतागते. अनुराधा हे पात्र पहिल्या अंकाच्या शेवटी नाटकात प्रवेशते आणि कथेला वेगळीच कलाटणी देते.

शेखर व कांचन मधले ते गुपित काय? शेखर तेवढं एकचं गुपित ठेवत असतो की अजूनही खूप सारी गुपिते त्याने दडवलेली असतात? नेहा आणि शेखर मध्ये नेमकं काय शिजतंय? अनुराधा नेमकी कोण? शेखर आणि कांचन मधलं गुपित यांचा नेहा आणि अनुराधा यांच्यासोबत काय संबंध असतो? एका घरात, चार पात्रांत नेमके काय काय संबंध आहेत आणि त्यात कुणाचे हेतू काय आहेत? हे सगळे प्रश्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली उत्कंठा ताणून धरतात.

सुरेश जयराम यांच्या काटेकोरपणे रहस्य सांभाळून ठेवणाऱ्या कथेला मंगेश कदमांनी उत्कृष्ट न्याय दिलाय. "छडा" पाहताना हे सांगूनही पटणार नाही की हे "एका लग्नाची गोष्ट" वाल्या दिग्दर्शकाचं नाटक आहे. राहुल रानडे यांनी संगीताची धुरा खूप कौशल्याने सांभाळलीय. एखादया सिनेमात जेवढ्या कौशल्याने वेगवेगळेे आवाज, echo वापरून परिणाम साधला जातो, तो एका रहस्यमय नाटकात live पाहताना अजूनच थरारपूर्ण वाटतो. प्रकाशयोजना खूपच परिणामकारक आहे आणि कथेतले वेगवेगळ्या वेळचे प्रसंग त्यात खूप छान पद्धतीने खुलून येतात.

प्रमुख पात्रांचे म्हणाल तर शेखरच्या भूमिकेत सौरभ गोखलेने जीव ओतलाय. उरलेल्या तिन्ही स्त्री पात्रांशी त्याचे असणारे वेगवेगळे संबंध व त्यानुसार त्याची बदलणारी देहबोली, हावभाव अप्रतिम आहेत. कांचनच्या भूमिकेत रेश्मा रामचंद्र भाव खाऊन जाते. एका मानसिक तणावग्रस्त, संशयी स्त्रीची भूमिका तिने लीलया पेललीय. ज्या उत्स्फूर्तपणे काही प्रसंगात ती रडते किंवा मनातली घालमेल, अपराधीपणा दाखवते ते कमाल आहे. नेहाच्या भूमिकेत वेदांगी कुळकर्णी चपखल बसलीय. तारुण्यसुलभ अल्लडपणा व अचानक आलेल्या विक्षिप्त परिस्थितीशी रिऍक्ट होताना होणारी भयकंप अवस्था तिने छान वठवलीय. अनुराधाच्या भूमिकेत मानसी कुलकर्णीने एक वेगळीच छाप सोडलीय. शांतता, संयम, गुढपणा आणि रहस्य उलगडल्यावर तितकाच उत्स्फूर्तपणा हे तिने खूप जिवंतपणे उभारलेय.

शेवटच्या 10 मिनिटांत नाटकाच्या रहस्यावरून जेव्हा पडदा बाजूला होतो तेव्हा आपण फक्त अवाक होऊन पाहत राहतो. प्रत्येक पात्राच्या वागण्या-बोलण्यातील सुसंगती आणि त्या पात्राचे त्या कथेतील स्थान हे किती महत्वाचे आहे हे शेवटी कळते. 2 तासांच्या या नाटकात दचकून जावे असे अनेक प्रसंग आहेत आणि शेवटही अगदीच अकल्पित आहे. सर्व पात्रांना सामान न्याय लेखकाने दिलाय, तर मंगेश कदमांनी सर्व पात्रांच्या बारीकात बारीक गोष्टींवरसुद्धा भरपूर मेहनत घेतलीय. या सर्व कथेला, सादरीकरणाला राहुल रानडे यांच्या संगीताने आणि प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्य-प्रकाशाने एका वेगळ्याच उंचीवर नेलेय.

एकुणात "छडा" हे नक्कीच एक आवर्जून पाहावं असं नाटक आहे !

- डॉ. विनय काटे

लिखाण आणि सकारात्मकता

मी इथे सकारात्मक लिहिण्याचा वसा घेतलेला नाहीये.... कारण सकारात्मकता सुद्धा सापेक्ष असते. मला जे सकारात्मक वाटते ते दुसऱ्याला नकारात्मक वाटू शकते आणि वाटते.

मी इथे सर्वकाळ वैचारिक, धीरगंभीर आणि पोक्त माणसा सारखे दुर्मुखलेले तोंड घेऊन लिहावे असे मला तरी वाटत नाही. माझे पण मुड्स असतात एक माणूस म्हणून.

मी ते लिहितो ते जे मला वाटते, मला सुचते. आवडत असेल तर स्विकार करा नाही तर दुर्लक्ष करून पुढच्या पोस्ट वर जा... "शिरापुरी... पुढच्या घरी" सारखे!

मला कुठल्याही लेबल ची गरज नाहीये  

 - डॉ. विनय काटे

फेसबुक पोस्ट ( २६ डिसेंबर २०१६, १४.५३ )