भारतीय पुरुषसत्ताक समाज किती विकृत नजरेने स्त्रीकडे पाहतो हे बलात्कारा सारख्या घटना आणि त्यानंतर समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया यामधून सहज दिसते. त्यांचे आपण थोडक्यात विश्लेषण करूया.
१) जातीय/धार्मिक पार्श्वभूमी:
बलात्काराला जातीय/धार्मिक पार्श्वभूमी असते. धार्मिक दंगलीमध्ये किंवा युद्धामध्ये दुसऱ्या धर्माच्या/समाजाच्या स्त्रियांवर अमानुष बलात्कार करण्याचा नीचपणा इथल्या समस्त धर्मीय पुरुषांनी दाखवलाय, ऐतिहासिक काळापासून ते अगदी आजवर. याला कारण एकच, साऱ्या धर्मांची, जातींची, समाजाची शुद्धता ही स्त्रीच्या योनिजवळ येऊन थांबते. म्हणून मग दुसऱ्या धर्माच्या, समाजाच्या, जातीच्या गंडस्थळावर वार करायचा असेल आणि त्यातल्या पुरुषांना टाचेखाली ठेवायचे असेल तर त्यांच्या स्त्रियांवर बलात्कार करणे हा सर्वात सोपा मार्ग असतो.
बहुतांश प्रमाणात बलात्कार हे जातीय/धार्मिक मानसिकतेतून होत असले तरी त्यामागे पुरुषी वर्चस्व आणि स्त्रीला उपभोग्य, हीन वस्तू समजण्याची वृत्ती मुळाशी असते. आणि ही वृत्ती समस्त भारतीय पुरुषांमध्ये आहे मग ते कुठल्याही जाती-धर्माचे असोत.
२) सामाजिक प्रतिक्रिया:
दर वेळेस कुठे बलात्कार झाला की "यांना भर चौकात फासावर टांगा", "यांचा शिश्न कापून टाका", "भारतात शरिया सारखा कायदा असावा" पासून ते "या जातीचे/धर्माचे लोक असेच असतात" अशा स्वरूपाच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. दुसऱ्या बाजूने "मुलींनी अंधारात, एकटे बाहेर पडायचेच कशाला?" किंवा "मुलींनी असले कपडेच कशाला घालावेत, आणि वरून दारू पिणे म्हणजे शी बाई! अजून काय होणार दुसरं?" असल्या पीडितेलाच दोषी मानणाऱ्या प्रतिक्रिया. या प्रतिक्रिया इतक्या टोकाच्या हिंसक असतात कि त्यापुढे बलात्कार करणारे सुद्धा सामान्य गुन्हेगार वाटावेत. आणि स्त्रियांना दोषी मानणारी वृत्ती म्हणजे अगदी 'निर्भया' केस मधल्या मुकेश सारखीच. कसलाही फरक नाही दोन्हींत.
2007 साली भारत सरकारने 13 राज्यांतील सव्वा लाख लहान मुला-मुलींचा सर्व्हे प्रसिद्ध केला, ज्यात 53% बालकांनी सांगितले की त्यांचे लैंगिक शोषण झालेय. एकूण बालकांपैकी 20% बालकांचे लैंगिक शोषण तीव्र स्वरूपाचे होते. विशेष म्हणजे एकूण पीडित बालकांपैकी 57% बालके पुरुष होती. आणि हे सर्वांना माहीत आहे की लहान मुलांचे लैंगिक शोषण जवळचे लोकच करतात. किती पुरुषांचे शिश्न कापाल आता? आपल्या घरात सुद्धा निम्मे पुरुष ह्या प्रवृत्तीचे आहेत हे मान्य कराल?
३) राजकारण:
समाजच इतका विकृत असेल तर राजकारणी आपसूकच जास्त विकृत असणार. 'बलात्कार पीडिता कोण आहे, तिच्यावरच्या अत्याचाराचे किती राजकीय भांडवल करता येईल, जातीय/धार्मिक ध्रुवीकरण करता येईल आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ कसा साधता येईल?' या एकाच हेतूने समस्त समाजाचे, पक्षाचे नेते आणि राजकारणी अशा ठिकाणी भेट देतात. कार्यकर्ते गोळा करून, भावना भडकावणारी आव्हाने करून, बलात्कारीत स्त्रीला धीर द्यायचे सोडून तिच्या नावाने आपले राजकीय हिशेब चुकते करायची संधी हे समस्त नीच लोक पुरेपूर वापरून घेतात.
पीडितेच्या गावाला आर्थिक मदतीची आश्वासने देणे, तिच्या नावाने 'फंड' उभारणे आणि तो वर्षानुवर्षे खर्च न करणे, अमुक-तमुक सरकारी वकील देण्याच्या घोषणा करणे, दुसऱ्या जातीच्या/धर्माच्या नेत्यांना पीडित कुटुंबाला भेटू न देणे, रेल्वे-बस जाळणे, बंद पुकारणे, मोर्चे काढणे हे सगळे प्रकार सगळ्या पक्षांच्या, जातीच्या-धर्माच्या नेत्यांनी केलेले आहेत ज्यातून पीडितेला कसलाही आधार मिळणार नसतो. आणि सामान्य लोक गाढवासारखे या नेत्यांच्या मागून या सगळ्या प्रकारात सहभागी होतात, मूळ मुद्दा सोडून.
४) न्यायालयीन लढाई आणि शिक्षा:
बलात्कार पीडित स्त्रियांपैकी बहुतांश स्त्रिया कधी न्यायालयात जातच नाहीत. कारण, एकतर कुटुंब-समाज आपल्याला टाकून देईल ही पीडित स्त्रीची भीती. बरेचदा बलात्कार करणारे घरातलेच असतात त्यामुळे अशा घटना घरातच दाबून टाकल्या जातात. बलात्कारी बाहेरचे असले तरी आपल्या मुलीचे आयुष्य बरबाद होईल म्हणून कुटुंबीय वाच्यता करत नाहीत. पोलीस आणि राजकारणी तक्रार नोंदवलीच कशी जाणार नाहीत यासाठी प्रयत्न करतात. त्यातून पण ज्या थोड्या-थोडक्या पीडिता कोर्टाची पायरी चढतात, त्यातल्या फक्त 25% केसेस मध्ये आरोपी गुन्हेगार ठरून शिक्षा मिळते. आणि या सगळ्या प्रकारात त्या स्त्रीला होणारा आर्थिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक इत्यादी त्रास याची काही मोजदाद नाहीच.
५) पीडित स्त्रीचे आयुष्य:
या मुद्द्याबद्दल तर न लिहिलेले बरे! बलात्कार पीडित स्त्रीकडे पाहायचा समाजाचा दृष्टिकोन इतका भयानक आहे की विचारू नये. ती विवाहित असेल तर नवरा-सासर टाकून देणार, अविवाहित असेल तर लग्न होणार नाही, शाळेत असेल तर तिलाच शाळेतून काढून टाकणार, नोकरीत असेल तर नोकरीचे वांदे. आणि समजा ती अनाथ, आदिवासी, गरीब, मतिमंद असेल तर तिचा बलात्कार हा बलात्कार नसतोच मुळी जगाच्या लेखी. अशा स्त्रियांच्या बाबतीत घडलेल्या अत्याचारांना ना मीडिया धसाला लावतो, ना समाज विचारतो, ना पोलीस भीक घालतात, ना राजकारणी तिकडे फिरकतात. एरव्ही आकांडतांडव करणाऱ्या स्त्रीवादी संघटना पण डोळे झाकून बसतात कारण त्या केस मध्ये ना ग्लॅमर, ना मांडवली करण्यात पैसा! उरलेल अख्ख आयुष्य या सगळ्या पीडित स्त्रिया एखाद्या मढ्यासारखे जगतात.... समाजाकडून होणारा अवहेलनेचा बलात्कार सहन करत!!
बलात्कार एक सामाजिक गुन्हा आहे, एका स्त्रीवर नाही तर समस्त सभ्य समाजावर, मग ती स्त्री कुणीही असो. आज वेळ आलीय ती या अत्याचारी प्रवृत्तींना समाजाने धडा शिकवायची, यांचा कसलाही जात/धर्म/पक्ष ना बघता सरसकट निषेध करायची. बलात्काराचे राजकीय पर्यटन आणि त्याआडून समाजात दुही माजवणाऱ्या प्रवृत्तींना आज मुळापासून ठेचायची गरज आहे, कारण हीच ती लोक असतात ज्यांचे कार्यकर्ते, नेते बलात्कार करण्यात आणि ते प्रकरण दडपण्यात आघाडीवर असतात. मोर्चे काढून, एकमेकांच्या जाती-धर्माविरोधात भाषणे देऊन, सामाजिक सौहार्द बिघडवून, जाळपोळ करून, राजकीय कंड शमवून किंवा हिंसक/अतिरेकी प्रतिक्रिया देऊन बलात्कार थांबणार नाहीत.
बलात्कार थांबवायचे असतील तर गरज आहे समाज म्हणून आपल्याला प्रगल्भ होण्याची, जिथे स्त्रियांना खरीखुरी समानतेची आणि सुरक्षेची वागणूक मिळेल, घरापासून ते अगदी सार्वजनिक स्थळी. आणि त्यासाठी आपापल्या घरातल्या पुरुषांना तसे संस्कार लहानपणापासून करावे लागतील. त्यातून पण एखाद्या स्त्रीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले तर सभ्य आणि सुजाण समाज म्हणून त्या पीडित स्त्रियांना मोकळेपणाने स्वीकारण्याची, त्यांना धीर देण्याची, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व कायदेशीर मदत आणि तपासयंत्रणा उभ्या करण्याची आणि गुन्हेगारांना कायदेशीर शासन करण्याची.
किती तरुण एखाद्या बलात्कारित मुलीशी स्वेच्छेने लग्न करतील, आणि अशा किती तरुणांची कुटुंबे त्या मुलीला आनंदाने स्वीकारतील? बलात्कार झाल्यावर बंदचे आवाहन करणारे, मोर्चे काढणारे, पीडित कुटुंबाची भेटी घेणारे आणि आर्थिक मदतीचे आश्वासन देणारे किती नेते, समाजसेवी अशा बलात्कारित अविवाहित मुलींना सुन म्हणून घरात आणतील किंवा विवाहित पीडितांना बहीण मानून त्यांच्या पाठीशी आयुष्यभर उभे राहतील??
शेवटच्या परिच्छेदातील प्रश्नांच उत्तर जोवर नकारार्थी आहे तोवर भारतीय पुरुषसत्ताक समाज मानवजातीवर एक कलंक असेल!!
डॉ. विनय काटे
- फेसबुक पोस्ट ( ६ सप्टेंबर २०१६, ०७.२२ )
No comments:
Post a Comment