Wednesday, January 4, 2017

भारतीय राष्ट्रभक्ती आणि पाकिस्तान -


या देशात तुम्ही देशभक्त आहात हे सिद्ध करायची सगळ्यात मोठी कसोटी म्हणजे पाकिस्तानला शिव्या देणे, तिथल्या खेळाडूंना, सामान्य लोकांना आणि प्रसंगी कलाकारांना जे सुचेल ते अश्लाघ्य बोलणे. मग प्रसंग क्रिकेटच्या मॅचचा असो की सीमेवरच्या चकमकीचा. भारत आणि पाकिस्तान हे दोन्हीही शांतीप्रिय देश नाहीयेत, हे दोन्ही देशांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. एकमेकांवर अतिक्रमणे, घुसखोरी, एकमेकांच्या देशांतर्गत फुटीर शक्तींना पैसा-शस्त्र पुरवणे आणि प्रसंगी दुसऱ्या देशाचे तुकडे पाडण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न करणे आणि त्याचे जाहीर प्रदर्शन करणे हे दोन्ही देशांनी वेळोवेळी केलंय, मग तो भूभाग बांगलादेश असो, बलुचिस्तान असो की कश्मीर-पंजाब असो!

150 वर्षे ब्रिटिशांनी भारत-पाकिस्तान वर राज्य केले, त्यांना लुटले, लाखो लोक जीवे मारले, पण तरीही दोन्ही देशांतील लोकांना ब्रिटिशांची अतीव चीड येत नाही. किंतु भारत आणि पाकिस्तान म्हणले कि मात्र लगेच एकमेकांना पाण्यात पाहायला सुरुवात. एकाच देशाचे तुकडे झालेले हे दोन देश एकमेकांचा इतका पराकोटीचा द्वेष करतात कि त्याला दुसरे उदाहरण नाही. आणि याला कारण आहे दोन्ही देशातील राजकारण्यांनी सतत जोपासलेला परस्पर वैरभाव. वैरभाव नेत्यांमधील नाही, तर सामान्य लोकांमध्ये प्रसारित केलेला वैरभाव! आपल्या देशाच्या समस्त समस्यांचे, दुःखाचे मूळ हे शेजारी देश आहे अशी सामान्य जनतेच्या मनात निर्माण केलेली भीती आणि द्वेषभावना दोन्हीकडेच्या नेत्यांनी प्राणपणाने प्रसवलीय आणि जपलीय.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले संघर्ष उगीच होत नाहीत, त्याला खूप सारी कारणे असतात. पाकिस्तानात सैन्य, नेते आणि कट्टर धर्मगुरू असा तिहेरी सामना सतत चालू असतो. भारतात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात सतत वेगवेगळ्या निवडणुकासाठीच्या लढती आणि त्यानुसार घोषणा ही जुगलबंदी चालू असते. आणि दोन्हीकडे असणाऱ्या सत्तालोलुप नेत्यांना, धर्मगुरूना आणि अतिरेकी वृत्तीच्या लोकांना जर स्वतःच्या देशात अधिक महत्व हवे असेल तर आपण शेजारी देशाला कसे नमवले, त्रासले यासारखा दाखवण्याजोगा मुद्दा नाही. म्हणून मग घुसखोरी, अतिरेकी हल्ले-बॉम्बस्फोट, रक्त पेटवणाऱ्या घोषणाबाजी वगैरे प्रकार अधूनमधून चालू असतात.

कधीकधी फक्त सत्ता हेच लक्ष्य नसते, तर आर्थिक हितसंबंध सुद्धा असतात. दोन्ही देशांचा विचार केला तर सैन्यासाठीचा खर्च हा एकमेव खर्च आहे ज्याला कुठलाही माहितीचा अधिकार लागू होत नाही की कुठले बजेट अडवू शकत नाही. आणि शस्त्रास्त्र खरेदी इतकी लाच क्वचितच कुठल्या सौद्यात दिली जाते नेत्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना! आंतरराष्ट्रीय पातळीवर शस्त्रव्यापारी आणि दलाल यांना अशांत असणारे देश म्हणजे पर्वणी असते आणि अशा भागांना अशांत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात दोन्ही बाजूच्या नेत्यांना, लष्करी अधिकाऱ्यांना हाताशी धरून. सीमेवर जीव देणारा जवान आणि लष्करी मुख्यालयांमध्ये बसून शस्त्र खरेदीचे व्यवहार करणारे अधिकारी यांत जमीन अस्मान चा फरक असतो. कधीही कुठलाही लष्करी जनरल शहीद होत नाही, तो रिटायर होऊन राजकारणात शिरतो किंवा लष्करी तज्ज्ञ म्हणून एकतर माध्यमात आग ओकत राहतो किंवा दलाली करत राहतो. खूप सारी उदाहरणे दोन्ही बाजूला पाहायला मिळतील याची.

14-15 ऑगस्ट 1947 ला भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश स्वतंत्र झाले एका देशाची फाळणी होऊन. पाकिस्तानच्या दुर्दैवाने बॅरिस्टर जीना वर्षभरात वारले आणि नंतर त्यांच्याकडे सैन्य आणि राजकारणी यांची जुगलबंदी रंगली ज्यात तिसरा कोन धर्मगुरूंनी ठेवला. भारताच्या सुदैवाने आपल्याला नेहरू, आंबेडकर यांच्यासारखे शहाणे नेते लाभले ज्यांनी धर्म बाजूला ठेवत, सैन्य लोकशाही नेतृत्वाच्या अधीन ठेवणारी एक योग्य व्यवस्था निर्माण केली आणि त्याला संवैधानिक परिमाण दिले. एवढा एकचं फरक आहे जो भारताला एक विकासशील राष्ट्र बनवतो आणि पाकिस्तानला एक मागास, व्यवस्थाविहिन धर्मातिरेकी राष्ट्र! भारतीय म्हणून आपल्याला आपल्या लोकशाही व्यवस्थेबद्दल, धर्मनिरपेक्षतेबद्दल आणि शांततापूर्ण सहजीवनाबद्दल अभिमान वाटला पाहिजेच!

पण, दुर्दैवाने काही लोकांना स्वतःच्या देशाबद्दल असणारे प्रेम व्यक्त करायला शेजारी देशांबद्दल असणारा द्वेष व्यक्त करायला पाहिजेच असे काहीसे वाटते जे अत्यंत बालिश आहे. अशा लोकांना मग सनी देओल, अक्षयकुमार चे सिनेमे पाहून जो त्वेष चढतो तो त्यांची बौद्धिक पात्रता दाखवून देतो. सीमेवर चकमक झाली की मग शेजारी देशासोबत खेळ, कला, व्यापार यांतील संबंध बंद करा अशा आरोळ्या दोन्ही बाजूने ऐकायला येतात. यातून निष्पन्न काहीच होत नाही, उलट शेजारी देशातील जे खेळाडू, कलाकार, व्यापारी यांवर आपल्या देशातील लोकांनी पैसा लावलेला असतो त्यांचंच नुकसान... म्हणजे थोडक्यात स्वतःच्याच देशाचं नुकसान!

"पाकिस्तानात शरिया आहे तसा कायदा आपल्याकडेही पाहिजे होता" ही असली मूर्ख दिवास्वप्ने आपल्या देशातले धार्मिक कट्टरही इथे पाहत बसतात. "अण्वस्त्र टाकून त्यांचा देश बेचिराख करू" या वल्गना दोन्ही देशातले अडाणी लोक ताव मारून करत असतात, जणू काही अण्वस्त्रे म्हणजे खायची गोष्ट आहे. या लोकांच्या अल्पमतीचे मला विशेष कौतुक वाटते. आणि वाईट याचं जास्त वाटतं की भारतात सुद्धा तितकेच मूर्ख लोक भरलेले आहेत ज्यांना पाकिस्तानशी तुलना करायची असते प्रत्येक बाबीत!

भारताने पाकिस्तानशी तुलना किंवा स्पर्धा करावी यासारखा मूर्खपणा कुठलाही नसेल, मग ती गरिबी निर्मूलनात असो की धार्मिक कट्टरतावादात. जो देश आधीच भिकेला लागलाय, व्यवस्थाविहीन झालाय, त्यांच्याशी कसली आलीय तुलना आणि स्पर्धा?? भारताने स्पर्धा आणि तुलना करायचीच असेल तर अर्थव्यवस्थेत अमेरीका, जपानशी करावी; खेळात अमेरीका-चीन च्या ऑलिम्पिक मेडल्सशी करावी; मानवी विकास निर्देशांकात स्वीडन-स्वित्झर्लंडशी करावी; कायदा-सार्वजनिक आरोग्य आदी व्यवस्थांत ब्रिटनशी करावी; संशोधनात युरोप-अमेरिकेशी, शेतीत इस्त्राईल-ऑस्ट्रेलियाशी करावी. ज्या ज्या क्षेत्रात जे देश आघाडीवर आहेत त्यांच्याशी स्पर्धा करावी, त्यांचा अनुनय करावा आणि प्रगती करावी. मागास देशांशी स्पर्धा करून आपण फक्त मागास देशच बनून राहू शकतो, प्रगत नाही!!

तेव्हा, मिडिया, सोशल मिडिया, राजकारणी, आजी-माजी सैन्य अधिकारी, अतिरेकी धर्मगुरू आणि अतिउत्साही क्रीडासमालोचक यातील कट्टर विचार सोडून, जरा थंड डोक्याने जगाकडे बघा. आणि खरंच जर स्वतःच्या देशाबद्दल प्रेम आणि अभिमान असेल तर तो आपआपल्या क्षेत्रांत जगात सर्वोत्कृष्ट असणाऱ्या व्यक्तींना, देशांना अनुसरुन दाखवा... त्याने देश खऱ्या अर्थाने महान बनेल. फक्त 'मेरा भारत महान' म्हणून कुणीही महान होत नाही!!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( १ ऑक्टोबर २०१६, २२.१२ )

No comments:

Post a Comment