Wednesday, January 4, 2017

2019 - मोदींना विरोधी कोण?


अवघ्या अडीच वर्षाच्या मोदींच्या राज्यात देशातले अंतर्गत वातावरण इतके गढूळ झालेय कि या देशात माणसे राहतात कि वेगवेगळ्या जातींच्या/धर्माच्या टोळ्या असा प्रश्न पडावा. समस्त जाती आणि धार्मिक समूह एकमेकांप्रती एवढे अविश्वासू आणि सचिंत कदाचितच आधी कधी झाले असतील. पण याला फक्त मोदी सरकारच जबाबदार आहे का? उत्तर निश्चितच नाही असे असेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक सौहार्दाचे जितके नुकसान संघ, भाजप, विहिंप आदी उजव्या शक्तींच्या उघडउघड प्रतिगामी कृतींनी केलंय त्यापेक्षा कैकपट जास्त नुकसान तथाकथित पुरोगामी पक्षांच्या स्वार्थी फारकतींनी किंवा तडजोडीनी, दुटप्पी वागण्याने आणि निष्क्रियतेने केलेय.

डाव्यांना भारतातले जातवास्तव आणि त्याचे आर्थिक, सामाजिक परिणाम कधी कळलेच नाहीत त्यामुळे ते आजही सगळ्या प्रश्नांची उत्तरे आर्थिक वर्गात हुडकत अस्तंगत होत चाललेत. जातीय-धार्मिक प्रश्नांबाबत कोणतीही भूमिका न घेता डावे पक्ष शहामृगासारखे तोंड लपवून वेळ मारून नेतात. केरळमध्ये जे चांगले काम डाव्यांनी केले ते त्यांना इतर राज्यात करता आले नाही हे सुद्धा खूप दुर्दैवी आहे. त्यामुळे केरळ हा अपवाद तर बंगाल हे डाव्या आर्थिक विचारांच्या पराभवाचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून उभे राहते.

भारतातले समाजवादी हे खरंच "नर ना मादी, ते समाजवादी" म्हणावे इतके वाया गेलेले आहेत. एक धर्म, एक जात आणि एक नेत्याचे कुटुंब यापलीकडे त्यांचे कार्यक्षेत्रच नाहीये. सपा आणि जनता दलाच्या शाखा ही एक समृद्ध अडगळ आहे जिला कसलीही vision आणि भविष्य नाहीये. भ्रष्टाचार, घराणेशाही, गुंडशाही यांच्या वळचणीला यांनी समाजवादाचे घोडे नेऊन कायमचे बांधलेय. अधूनमधून हे समाजवादी उजव्या शक्तींच्या सोबत मिळून नुरा कुस्ती सुद्धा खेळत असतात ज्याचा उद्देश फक्त मतांचे ध्रुवीकरण असते.

बसपा, द्रमुक, अण्णा द्रमुक, रिपब्लिकन हे तथाकथित बहुजनवादी एका नेतृत्वभोवती केंद्रित झालेत. त्या नेतृत्वाला जशी वेळ आली तशी या पक्षांनी सगळे बहुजनवादी सिद्धांत बासनात गुंडाळून आळीपाळीने काँग्रेस आणि भाजप यांच्याशी संसार थाटले. त्यामुळे त्यांच्या बहुजनवादी असण्याच्या भूमिकेच्या बाबत सदैव संशयाचे धुके राहिले आणि त्यामुळे हे पक्ष त्यांच्या नेत्याच्या राज्याबाहेर कधीही मोठे होऊ शकले नाहीत आणि होणारही नाहीत.

काँग्रेसोद्भव पक्ष नावाचा अजून एक प्रकार भारतात आहे ज्यात पूर्वाश्रमीचे काँग्रेसी विसावतात. या पक्षांची विचारसरणी मूलतः काँग्रेसी असते फक्त यांना 'हाय कमांड' झेपत नाही, म्हणून मग आपापल्या राज्यात छोटीशी चूल मांडून ते मोकळे होतात. राष्ट्रवादी, तृणमूल सारखे हे पक्ष म्हणजे असून 'अडचण आणि नसून खोळंबा' असतात. विधानसभेत हे वेगळे अस्तित्व ठेवतात आणि लोकसभेत काँग्रेसच्या गोटात वावरतात. राष्ट्रीय राजकारणात सत्तेची रमी जुळवायला हे जोकर उपयोगी पडतात आणि त्यांची किंमत त्यावेळेस असणाऱ्या त्यांच्या गरजेइतकीच असते.

आता राहिली खुद्द काँग्रेस! 1885 साली स्थापन झालेला हा पक्ष आज घायकुतीला आलाय. गेल्या 3 वर्षात काँग्रेसची जितकी वाताहत झालीय तितकी जगात कुठल्याही राजकीय पक्षाची झाली नसावी, आणि तरीही ते मान्य करायला तयार नाहीत. सत्तेत असणारा पक्ष फक्त 44 खासदार निवडून यावे इतका आपटावा यातच काँग्रेसची चुकलेली धोरणे आणि राजकीय गणिते दिसतायत. 1984 ला भाजपकडे फक्त 2 खासदार होते, पण तरीही भाजप आक्रमक होती, धोरणी होती. रामजन्मभूमी, रथयात्रा, मंडल असे मुद्दे तापवून भाजपने स्वतःची जमीन तयार केली होती. पण 44 खासदार असूनसुद्धा काँग्रेसला काहीही करता न येण्याइतका लकवा भरलाय.

गेल्या अडीच वर्षात असे अनेक मुद्दे आले जिथे काँग्रेसने सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून भूमिका घेणे अपेक्षित होते, पण दरवेळेस काँग्रेस तोंड चुकवून पळत राहिली. जेव्हा धर्मांध शक्ती धुमाकूळ घालत होत्या, विष ओकत होत्या तेव्हा काँग्रेसला वाटत होते की आपण काही बोललो तर सवर्ण हिंदू दूर जातील, आणि म्हणून ते मूग गिळून बसले होते. काँग्रेसला हे मात्र कळले नाही की देशातले किमान 80% सवर्ण हिंदू हे धर्मनिरपेक्ष विचारांचे आहेत आणि काँग्रेसने न्यायाची बाजू घेतली असती तरी त्यांना काहीही वाईट वाटले नसते. पण स्वतःच्या राजकीय षंढत्वाने काँग्रेसने शांतताप्रेमी सवर्ण हिंदू तर दूर घालवलेच, पण सोबत हक्काची दलित-मुस्लिम मते पण घालवली. काँग्रेसचे भवितव्य खरेच अंधकारमय आहे आणि रामचंद्र गुहा यांच्यासारखा गांधीवादी विचारांचा विद्वानसुद्धा जेव्हा "राहुल गांधींनी लग्न करून मोकळे व्हावे" असा सल्ला देतो तेव्हा परिस्थिती खरंच भीषण असते.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर द्यायला आजचा एकही तथाकथित पुरोगामी राजकीय पक्ष कसलेही बळ राखून नाहीये. समस्त उजव्या शक्ती संघाच्या एकछत्री अंमलाखाली एकवटल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला पुरोगामी आणि धर्मनिरपेक्ष शक्ती मात्र सतराशे साठ पक्षांत विखुरल्यात. आज 32% मते पडली म्हणून ज्यांना पुरोगामी हिणावतायत ते उजवे पुढच्या वेळी कदाचित लोकसभेत 2/3 बहुमत आणि 2/3 राज्यांत युतीद्वारे सत्ता सुद्धा आणू शकतील. आणि असे काही घडले तर त्यादिवशी या देशाची राज्यघटना आणि एकूणच देशाची एकात्मता धोक्यात असेल! भाजप आणि संघाच्या या बेफाम घोडदौडीला आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांना फक्त आजच्या तथाकथित धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांचे (काँग्रेस, डावे, समाजवादी इत्यादी) राजकीय षंढत्व आणि अप्पलपोटे मूल्यविहिन राजकारण कारणीभूत असेल!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ४ ऑक्टोबर २०१६, १६.४२ )

No comments:

Post a Comment