Wednesday, January 4, 2017

'मराठा कुणबी समाजाची दशा आणि दिशा' -


या नावाचे मा.म. देशमुख यांनी लिहिलेले एक छानसे पुस्तक मी शाळेत असताना साधारण १७-१८ वर्षांपूर्वी वाचले होते. जागतिकीकरणाचे परिणाम दृश्य स्वरूपात तेव्हा तरी इतके दिसू लागले नव्हते, आणि ते पुस्तक तर त्याआधी कित्येक वर्ष लिहिले होते म्हणजे जागतिकीकरणात भारत सहभागी व्हायच्या आधी. त्यामुळे पुस्तकातले प्रगतीचे आर्थिक निकष हे बऱ्यापैकी सरकारी नोकरीत समाजाचा वाटा, कृषी उत्पन्न अशा गोष्टींमधल्या तूलनेचे होते आणि राजकीय निकष हे प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या संख्येचे होते.

९-१० वर्षांपूर्वी सांगलीत शरद पवारांनी एक 'शेतकरी मेळावा' घेतला होता, ज्याला मी उपस्थित होतो. त्यात त्यांनी केलेले भाषण हे खूप विचार करण्याजोगे आणि येणाऱ्या काळात होणाऱ्या बदलांबद्दल शेतकऱ्यांना इशारा देणारे होते. SEZ असो, सिंचनाचे प्रकल्प असो, महामार्ग असो, विमानतळे असोत, उद्योगांसाठी लागणारी जमीन असो की शहरांची होणारी वाढ असो, या सगळ्यांसाठी शेतजमिनी ताब्यात घ्याव्या लागतील, हा इशारा पवारांनी दिला होता. तसेच, आजोबाच्या काळात जमीनदार असणारा शेतकरी, नातवाच्या काळात अल्पभूधारक बनतो कारण जितके मोठे कुटुंब होत जाते तितके जमिनीचे तुकडे होत जातात, हे सुद्धा पवारांनी सांगितले होते. आणि त्यांनी समस्त शेतकऱ्यांना सल्ला दिला होता की शेती हि जोडव्यवसाय म्हणून करा, चारितार्थाचे एकमेव साधन म्हणून नको!

देशमुखांनी दिलेले तात्कालिक आर्थिक, राजकीय निकष आजकाल जवळपास गैरलागू आहेत. पवारांचे भाषण फक्त सल्ला म्हणून आकाशवाणी व्हावी तसे हवेत विरून गेले काही दिवसातच, जे व्हायला नको होते. मराठा-कुणबी समाजाचे अर्थकारण आणि आर्थिक पत ही प्रामुख्याने पारंपरिक शेतीवर आधारित आहे, आणि तेच त्यांच्या हळूहळू होत असलेल्या दुर्दशेला बहुतांशी जबाबदार आहे. कारण, प्रत्येक पिढीगणिक शेतजमीन लहान होत चाललीय, आणि जितकी लहान शेती तितका खर्च जास्त आणि उत्पन्न कमी हे साधं अर्थशास्त्रीय सूत्र आहे. अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर यांच्या जीवनमानात काहीही विशेष फरक नाहीये आजच्या घडीला, दोघांचंही जीवन हलाखीचे बनत चाललंय अगदी निर्विवादपणे!

मराठा-कुणबी समाजाच्या या दशेला नेमकं जबाबदार कोण आहे मग? या प्रश्नाचा थोडा खोलात जाऊन विचार करूयात. महाराष्ट्रातील सहकारी (आणि खाजगी सुद्धा) साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध डेअरी, कृषीउत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँका, पतसंस्था, स्थानिक सोसायटी या संस्थांमध्ये एकाधिकारशाही कुठल्या समाजाची? तर निर्विवादपणे मराठा-कुणबी समाजाची. चेअरमन, अध्यक्ष, सभासद सगळे बहुतांशी मराठा-कुणबी समाजातूनच. ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा या राजकीय संस्थांत महाराष्ट्रात प्राबल्य कुणाचे तर मराठा-कुणबी समाजाचे, मग पक्ष कुठलाही असो. रयत शिक्षण संस्था, डी वाय पाटील, भारती, सिंहगड, MGM, गोदावरी इत्यादी खासगी प्रमुख शिक्षणसंस्थाचे बहुतांश अध्यक्ष-संचालक आणि संस्थापक (अपवाद फक्त रयत) कुठल्या समाजाचे, तर निर्विवादपणे मराठा-कुणबी समाजाचे!

मग महाराष्ट्रातील राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सहकारक्षेत्राच्या आणि कृषिसंबंधीत समस्त संस्था मराठा-कुणबी समाजाकडे असतानाही बहुतांश मराठा-कुणबी समाज त्रासात का? मराठा-कुणबी शेतकरी आत्महत्या का करतायत? या प्रश्नाचे उत्तर ज्यावेळेस मराठा-कुणबी युवकांनी शोधायचा प्रयत्न केलाय तेव्हा त्या समाजातील नेत्यांनी नेहमी परप्रांतीय, ब्राम्हण, दलित, मुस्लिम, OBC यांच्याकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकली. समस्त सहकारक्षेत्र, आर्थिक आणि शैक्षणिक संस्था मराठा नेतृत्वाने राजकीय कुरण म्हणून वापरल्या, स्वतःचाच घरातल्या लोकांना संचालक नेमून प्रचंड भ्रष्टाचार केले, संस्था तोट्यात घालवून बंद पाडल्या, संस्था पुनर्जीवित करण्यासाठीची सरकारी अनुदाने सुद्धा लाटली आणि स्वतःच्या पोतड्या भरल्या.

ऊसाला, दुधाला भाव द्या म्हणून मराठा-कुणबी शेतकऱ्यांनाच रस्त्यावर यावं लागते, तेपण स्वतःचाच समाजाच्या नेत्यांच्या ताब्यात असलेल्या कारखाने आणि दुधसंघा विरोधात, ज्यात डोकी फुटतात. जमीन अधिग्रहण विरोधात त्यांनाच उतरावं लागते, त्यांच्याच समाजाच्या नेत्यांविरोधात, जिथे गोळ्यासुद्धा झाडल्या गेल्यात शेतकऱ्यांवर. सरकारी अनुदाने, 1 रुपया भाडेपट्ट्यावर मिळालेल्या जमिनी यांतून सुरु झालेल्या खासगी, अभिमत शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी स्वतःचाच समाजातील नेत्यांना बाजारभावाने डोनेशन द्यावे लागते मराठा-कुणबी युवकाला. याच शिक्षणसंस्थांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये नोकरीसाठी याच तरुणांना, याच नेत्यांना बाजारभावाने लाखो रुपये द्यावे लागतात, ज्यासाठी कित्येक मराठा-कुणबी युवकांनी जमिनी विकल्यात.

दरवेळेस मराठा-कुणबी समाजातील बहुतांश गरीब मुलांना त्यांच्या दुर्व्यवस्थेला बाकीचे समाज कसे कारणीभूत आहेत हे या नेत्यांकडून शिकवले जाते. एकूण job market मध्ये सध्या सरकारी नोकऱ्या 1% पण राहिल्या नाहीयेत, त्यामुळे तिथल्या reservation मुळे कुणी सोन्याचा बंगला बांधला नाहीये कि कुणावर उपाशी मरायची वेळ आलेली नाहीये. शिक्षणाचीही तीच अवस्था आहे, कारण बहुतांश जागा अभिमत विद्यापीठात आहेत जिथे reservation नाहीये, पण म्हणून तिथे गरीब मराठा-कुणबी समाजाला त्यांचे नेते आर्थिक आरक्षण किंवा डोनेशन शिवाय प्रवेश देतच नाहीत, उलट ते प्रवेश देतात जास्त पैसे देणाऱ्या परप्रांतीय मुलांना... हवं तर भारती, DY पाटील आणि सिंहगड च्या मेडिकल कॉलेज मध्ये एखादी चक्कर मारून बघा, आणि या अभिमत कॉलेज मधून शिकलेल्या Engineering, MBA वाल्या मुलांच्या नोकरीची स्थिती पण पहा.

मराठा-कुणबी समाजातील युवकांनी बदलत्या काळाची पावले ओळखली पाहिजेत. पवारांनी सुचवल्याप्रमाणे त्यांनी शेती हा जोडधंदा म्हणून ठेवून मुख्य व्यवसाय, नोकरी वेगळ्या क्षेत्रात केली पाहिजे. त्यासाठीचे जरुरी शिक्षण सुद्धा चांगल्या दर्जाच्या शिक्षणसंस्थांमधून घेतले पाहिजे. शेती करायचीच असेल तर आधुनिक पद्धतीने शेती आणि शेतीशी पूरक जोडव्यवसाय करत जागतिक बाजारपेठेशी मुकाबला करण्याजोगे उत्पादन, फायदेशीर पद्धतीने करावे लागेल. आणि त्यासाठी प्रसंगी तोट्यात घालणाऱ्या सहकारी, सरकारी आणि राजकीय संस्थांची बंधने झुगारून द्यावी लागतील. अपवादाने घडलेल्या दुर्दैवी घटनांच्या निमित्ताने राजकीय पोळी शेकणाऱ्या; कुठल्यातरी समाजामुळे, कायद्यामुळे समाजाची दयनीय अवस्था झालीय म्हणून फितवणाऱ्या; महापुरुषांच्या, स्मारकांच्या, पुस्तकांच्या, पुरस्कारांच्या नावाने चिथावणाऱ्या शक्तींना ओळखून त्यापासून दूर राहावे लागेल.

छत्रपती शिवाजी, शाहू महाराज, महर्षी शिंदे, पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या महापुरुषांच्या खऱ्या चारित्रांमधून त्यांचे काळाच्या पुढे असणारे साकल्याचे, विधायक विचार अंगिकारत बदललेल्या काळानुरूप या समाजाला बदलावे लागेल. तोट्यात घालणाऱ्या, मागे नेणाऱ्या राजकारण्यांच्या नादी न लागता, स्वतःचे नशीब कष्टाने आणि विचारांनी बदलावे लागेल. अन्यथा हरियाणा मधल्या जाट समाजाचं उदाहरण खूप बोलके आहे, ज्यांनी जमिनी विकून Audi, BMW घेतल्या आणि नंतर त्या चालवायला सुद्धा पेट्रोलला पैसे राहिले नाहीत कित्येकांकडे. पुण्यातही असे काही गुंठामंत्री, गोल्डन मॅन काय फळाला पोचलेत ते महाराष्ट्राने पाहिलंय. अपेक्षा करतो की मराठा-कुणबी समाजाचे युवक नजीकच्या भविष्यात एक नवी दृष्टी घेऊन महाराष्ट्राच नेतृत्व एका आदर्श पद्धतीने करतील.

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( ११ सप्टेंबर २०१६, १२.३० ) 

No comments:

Post a Comment