Wednesday, January 4, 2017

IIM Ahmedabad - गुण गाईन आवडी!


भिरभिर पावसात सूट घालून स्कुटी वर कॉलेजला चाललेली कुठल्याशा इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ची MBA ची विद्यार्थिनी पाहिली, अन IIM अहमदाबाद च्या प्रथम वर्षाच्या वर्गात अंगात टीशर्ट बर्मुडा/शॉर्टस आणि पायात बाथरूम स्लीपर्स घालून, विनाआंघोळीचे, अस्तव्यस्त केस घेऊन बसलेले आम्ही सगळे मुले-मुली आठवलो. IIM च्या अधिकृत फोटोशूटला सुद्धा जेव्हा पासपोर्ट साईझ फोटो काढायचा होता तेव्हा मुले बर्मुडा वर कोट घालून गेली होती. IIM ला जायच्या आधी जोशी सर सांगायचे की "IIM Ahmedabad म्हणजे भारतातल्या सर्वात हुशार आणि विचित्र लोकांची मांदियाळी!" आणि ते अजिबात खोटे नव्हते.

विद्यार्थ्यांच्या creativity ला, नवीन विचारांना चालना देण्यात IIM कुठलीही कसर सोडत नसे. युनिफॉर्मचे बंधन नाही, काय खावे-प्यावे यात कुणाची ढवळाढवळ नाही, कुणी-कुणासोबत-कुठे झोपावे यात कुणाला कसलीही हरकत नव्हती, कुठेही-कधीही येजा करा कुणाला त्रास नव्हता. Boys hostel मध्ये मुली आणि girls hostel मध्ये मुले राहिली, तिथले बाथरूम वापरले तरी कुणाला त्रास नव्हता. "Weed घेतली नाही तर आयुष्यात काहीतरी अनुभवायचं शिल्लक राहिलंय तुमचं!" म्हणून सांगणारे IIT, IIM, LSB मध्ये शिकलेले-शिकवलेले प्राध्यापक सुद्धा होते. "वर्गात कंटाळा येतोय ना? चला बाहेर लॉन मध्ये बसूया" म्हणून पायऱ्यांवर बसून शिकवणाऱ्या अनु वैद्यनाथन पण होत्या. कुणाची संस्कृती-धर्म-राष्ट्रीयता कशाने त्रासत नव्हती.

बंधन फक्त एकाच गोष्टीचे होते - अभ्यासाचे आणि excellence चे! 100% उपस्थितीचे आणि काटेकोरपणे वेळ पाळण्याचे. Project submission ची डेडलाईन 23.59.59 hrs असली की रात्री 00.00.00 hrs ला, फक्त 1 सेकंदानंतर online submission ची लिंक गायब व्हायची. 8.45 am च्या lecture ला 8.46 ला पोचलात तर तोंडावर दार बंद व्हायचे. Surprise quiz ची नोटीस/email आले की जेवत्या ताटावरून उठून पळावे लागे. "तब्येत खराब आहे" किंवा "आठवडाभर झोपलो नाही" असले excuses कुठल्याही प्राध्यापकाने ऐकून घेतले नाहीत. आजारपणामुळे 15 दिवस कॉलेज बुडाले म्हणून अख्खे वर्ष रिपीट करावे लागलेली मुलेही पाहिली आणि 4 वर्षाची Phd 7-8 वर्ष करणारे विद्यार्थी पण! 20 जण Phd साठी admission घ्यायचे त्यातले 5-6 जण तर पहिल्या वर्षानंतरच काढून टाकायची संस्था, कसलीही दयामाया न ठेवता! नापास होण्याच्या भीतीने मैत्रिणीने हाताची कापलेली नस आणि नंतर तिचं मी आणि एका प्रोफेसरनी केलेलं समुपदेशन सुद्धा अजून जसच्या तसं आठवतं.

अभ्यासाबाबत जेवढे बंधन मुलांना होते तेवढेच शिकवण्याचे बंधन शिक्षकांना होते. प्रोफेसर आजारी आहेत, रजेवर गेलेत त्यामुळे lecture होणार नाही हा प्रकार एकदाही अनुभवायला मिळाला नाही. पुढच्या 3 महिन्याचं time-table लागलेलं असायचं आणि त्यात कुठल्याही कारणाने कसलाही बदल व्हायचा नाही. इंदिरा गांधींच्या खुनाच्या दिवशी राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे IIM अहमदाबाद चे कार्यालयीन काम बंद होते पण lectures चालू होते ही आठवण एका 84-85 साली शिकलेल्या माजी विद्यार्थ्याने सांगितली होती. फक्त एका lecture साठी न्यूयॉर्क-मुंबई-अहमदाबाद असा प्रवास करून आलेले आणि lecture झाले कि लगेच उलट प्रवासाला निघालेले प्राध्यापक सुद्धा पाहिले. शेखर कपूर चे guest lecture रात्री 12 ते 2 या वेळेत ऐकलेय. राष्ट्रपती डॉ.कलाम जेव्हा guest lecture घेत तेव्हा त्यांच्या lecture च्या feedback चे form सुद्धा भरलेत विद्यार्थ्यांनी!

काही शैक्षणिक संस्था या उगाच नावारूपाला येत नाहीत. त्या संस्थांमधील excellence हा तिथे जे काम महत्वाचे आहे त्या कामासाठी दिलेल्या सर्वोच्च प्राथमिकतेतून आणि त्यात आडवे येणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत पाळल्या गेलेल्या zero tolerance मधून आलेला असतो. म्हणून IIM फक्त एक शिक्षणसंस्था नाही तर एक brand म्हणून अस्तित्व ठेवून आहे. 'Branded for life' लिहिलेले IIM Ahmedabad चे टीशर्ट घालताना आजही स्वतःबद्दल अभिमान वाटतो तो यासाठी!

डॉ. विनय काटे

- फेसबुक पोस्ट ( २१ सप्टेंबर २०१६, १०.३७ ) 

No comments:

Post a Comment